पुजारा, पंत आणि अश्विनच्या टीकाकारांना दादाचं प्रत्युत्तर; काय म्हणाला पाहा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. सिडनीच्या एमसीजी मैदानावर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने धमाकेदार कामगिरी करत कांगारूंना सामना ड्रॉ करण्यास भाग पाडले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. सिडनीच्या एमसीजी मैदानावर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने धमाकेदार कामगिरी करत कांगारूंना सामना ड्रॉ करण्यास भाग पाडले. भारतीय संघातील चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत आणि आर अश्विन यांनी दुसऱ्या डावात केलेल्या चिवट फलंदाजीमुळेच टीम इंडियाला हा सामना अनिर्णित राखता आला. संघाने केलेल्या या कामगिरीनंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी टीम इंडियाचे कौतुक करताना, पुजारा, रिषभ पंत आणि आर अश्विन यांच्या टीकाकारांना चांगलेच उत्तर दिले आहे.
"खाया पिया कुछ नही...गिलास तोडा बाराह आना"; सेहवागचा स्मिथला टोमणा
ऑस्ट्रेलियाच्या संघाने दुसऱ्या डावात सहा गडी गमावत 312 धावा केल्या होत्या. आणि त्यानंतर कांगारूंनी आपला डाव घोषित केला होता. त्यामुळे तिसरा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला 407 धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे लक्ष्य गाठताना अखेरचा दिवस संपेपर्यंत चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत आणि आर अश्विन यांनी दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णायक ठरवला. त्याच्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सोशल मीडियावरील ट्विटरवर संघाच्या कामगिरीवर अभिनंदन करत, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत व आर अश्विन यांच्या टीकाकारांना चांगलेच फटकारले आहे.
सौरव गांगुली यांनी आपल्या या ट्विट मध्ये लोकांना पुजारा, पंत आणि अश्विन यांचे संघातील महत्व आता समजले असेल, असे लिहिले आहे. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलिया सारख्या गोलंदाजांसमोर फलंदाजी करणे सोपे नसल्याचे सौरव गांगुली यांनी आपल्या या ट्विट मध्ये म्हटले आहे. तसेच सौरव गांगुली यांनी असेच कुणालाही कसोटीमध्ये 400 विकेट मिळत नसल्याचे पुढे म्हटले असून, टीम इंडियाने जोरदार झुंज दिली आणि आता मालिका जिंकण्याची वेळ आल्याचे गांगुली यांनी म्हटले आहे.
Hope all of us realise the importance of pujara,pant and Ashwin in cricket teams..batting at 3 in test cricket against quality bowling is not always hitting through the line ..almost 400 test wickets don't come just like that..well fought india..time to win the series @bcci
— Sourav Ganguly (@SGanguly99) January 11, 2021
दरम्यान, भारतीय संघातील सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दुसऱ्या डावात दमदार ओपनिंग केल्याचे पाहायला मिळाले. परंतु चौथ्या दिवशीच्या अखेरीस रोहित शर्मा आणि शुभमन गिल बाद झाल्यामुळे सामना ऑस्ट्रेलियाकडे झुकतो की काय असे वाटत असतानाच, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत यांनी केलेली धमाकेदार खेळी व शेवटी हनुमा विहारी व अश्विनची चिवट फलंदाजीमुळे सामना अनिर्णित राहिला. रिषभ पंत याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येत 118 चेंडूंचा सामना करत 97 धावा केल्या. तर चेतेश्वर पुजाराने 207 चेंडू खेळत, 77 धावा केल्या. आणि अश्विन 39 धावांवर नाबाद राहिला.